Protected by Copyscape DMCA Takedown Notice Infringement Search Tool

शुक्रवार, २३ मे, २०१४

ही लाली, ही पावडर, हे ठुमके!

ते चारजण की त्या चारजणी
रोजच दिसतात
कोपरखैरणे स्टेशनच्या एका
गर्दीने न व्यापलेल्या कोप-यात
नट्टापट्टा करताना
त्यांच्यात किंवा त्या नट्टयापट्टयात
काय जादू असते ठाऊक नाही
मात्र
येणा-या जाणा-या असंख्य माना
वळून पाहील्याखेरीज जात नाहीत
दोघांचाही नेमका उद्देश मात्र समजत नाही
नट्टयापट्टयाचाही आणि नजरांचाही
नजरांमधे,
कुतूहल, कीव, घॄणा की वासना
की एक मोठा शून्य...
रोजच्याच यंत्रवत हालचालींचा एक भाग
टाळी वाजवून हात पुढे करताना
वर बघायलासुद्धा वेळ नसणा-याला
वाटलेच तर मिळेल ते घेऊन
पुढची टाळी वाजवायला
चालू पडणा-या
नट्टयापट्टयात तरी शॄंगार कुठला
कुठले/ल्या तरी आहोत आम्हीही
हे ठसविण्याची
केविलवाणी धडपड तर नसेल
ही लाली, ही पावडर, हे ठुमके!
-----
विजय दिनकर पाटील

रविवार, ४ मे, २०१४

"कविता"(विशेषकरून आंतरजालावरची)

श्री. अनंत ढवळे ह्यांच्याशी काल(०३.०५.२०१४) अस्मादिकांची "कविता"(विशेषकरून आंतरजालावरची) ह्या विषयावर नाशिक येथे सविस्तर चर्चा झाली त्यातून काही विचारप्रवर्तक मुद्दे पुढे आले ते समस्त काव्यप्रेमी लोकांसाठी इथे देत आहे,

१.  आंतरजालाच्या अनिर्बंध उपलब्धतेमुळे इथे लेखनापेक्षा त्याच्या मूल्यमापनाला अधिक महत्व दिले जात आहे जे कवितेस बाधक आहे.

२. कवींमधे श्रेष्ठ / कनिष्ठ / उत्तम / सर्वोत्तम हे भेद अनाठायी असून जो तो आपापल्या पात्रतेनुसार लिहित असतो.

३. चांगली कविता कितीही टीका केली तरी टिकून रहाते आणि खराब कवितेला कितीही उचलून धरली तरी तिचा बहर ओसरतो, ती संपते.

४. मराठी गझलेत 'सुरेश भटांनंतर कोण' हा वाद निरर्थक असून कवींनी ह्यात न पडता दर्जेदार काव्य निर्मितीवर भर दिला पाहिजे. कुणानंतर कोण हे काळच ठरवत असतो. त्यामुळे लिहिणा-यांनी असे वाद छेडून आपला बहुमुल्य वेळ दवड्ण्यात हशील नाही.

नको निष्कर्ष काढू एवढ्यातच तू
करू दे काळ त्याचे काम शिस्तीने

धन्यवाद!