Protected by Copyscape DMCA Takedown Notice Infringement Search Tool

सोमवार, २१ एप्रिल, २०१४

आचारसंहीता

माणूस दोनच प्रकारचे लिहू शकतो.

गद्य आणि पद्य!

ह्य दोन्ही प्रकारांमधे सामावलेल्या अनेक उपप्रकारांतील कशाची निवड स्वत:ला  व्यक्त करण्यासाठी करायची हे सर्वस्वी लिहीणा-याचा कल, त्याने केलेला अभ्यास, त्याने आत्मसात केलेले लेखन कौशल्य, देऊ शकत असलेला वेळ ह्या आणि केवळ ह्याच गोष्टींवर अवलंबून असते.

परंतू हे उपप्रकार हाताळणा-यांच्या डोक्यात सध्या एक भ्रम स्थिरावत आहे असे दिसून येत आहे. लिहीत असलेल्या उपप्रकाराचा आकृतीबंध अधिक कौशल्याची मागणी करीत असल्यामुळे काही विशिष्ट लिहीणा-यांमधे एक अचिव्हमेन्ट्चा अहंकार बळावताना दिसून येत आहे. त्यामुळे आपण कशावरही आणि कुठल्याही भाषेत मत देऊ शकतो असे त्यांना वाटू लागलेले आहे.

प्रकार कुठलाही असला तरी तो प्रथम तो ’पद्य’ किंवा ’गद्य’ ह्या दोन कसोट्यांवर तपासला गेला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला ओवी ह्या उपप्रकारात व्यक्त व्हायचे असेल तर ओवीचा आकृतीबंध  पाळण्याआधी आपण लिहितो त्यात ’पद्य’ कितपत आहे हे त्रयस्थपणे तपासून पाहीले पाहिजे. त्यानंतर बाकीच्या गोष्टी. कवितेत काव्य नसून बाकी सगळे असले तर काय उपयोग?

अल्पश: किंवा अजिबात नसलेल्या ज्ञानाच्या  बळावर आपण स्थिरावायला धडपडत आहोत त्या साहीत्यप्रकारात हवे तितके सोयीचे राजकारण करता आले की जीवनाचे सार्थक झाले असे मानना-या लेखक/कवींच्या संख्यमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

निवडणुका सुरू आहेत, काही ठिकाणी अजून मतदान व्हायचे आहे. देश चालवायला उत्सुक असलेल्या सर्वच पक्षांची अस्तित्वाची धडपड सुरू आहे परंतू सामान्य नागरीकाला वात आणणा-या ह्या सत्तास्पर्धेलाही काही ’आचारसंहीता’ आहे जी कटाक्शाने पाळली जात आहे. साहीत्यातल्या सोयीच्या राजकारणाच्या आखाड्यात अशी काही आचारसंहीताच नाही म्हणून ज्याला जे वाट्टेल तो ते बरळू लागलेला आहे! ह्या सगळ्या गदारोळात अलिप्त राहून साहित्यसेवा करणारे काही मोजके लिहिणारे आहेत आता त्यांनाच पुढे येऊन ही थेरं रोखण्याकरीता काहीतरी करावे लागेल अशी वेळ आलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: